पुणे : सामाजिक जाणिवेतून कार्यरत असलेल्या अभि चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे रक्तदान व अवयवदान जागृती शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. बाणेर येथील अभि ग्रुप उद्योग समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. जितेंद्र जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबीर घेण्यात आले. पुलवामा येथील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून शिबिराची सुरुवात झाली. या शिबिराचे उद्घाटन आमदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.
‘तरुणांनी समाजासाठी व देशसेवेसाठी पुढाकार घेऊन एकत्रित यायला हवे,’ अशी भावना मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
या शिबिरात ७५ पेक्षा अधिक जणांनी रक्तदान केले. वाय. सी. एम. पिंपरी-चिंचवड ब्लड बँकच्या मदतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. ‘रक्तदानाबरोबरच अवयवदानही महत्वाचे आहे. एका व्यक्तीच्या अवयवदानाने इतर सात व्यक्तींचे जीव वाचू शकतात. त्यामुळे अवयवदानाबाबत असलेले गैरसमज काढून टाकावेत व अवयवदानाचे महत्व तळागाळापर्यंत पटवून देण्याचे काम व्हावे,’ अशी भावना डॉ. जितेंद्र जोशी यांनी व्यक्त केली.
अवयवदानाचे महत्व पटवून देण्यासाठी तेजपाल सिंग यांनी मार्गदर्शन केले. या शिबिरास कंपनीचे पदाधिकारी, कर्मचारी व या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.